आसरा किंवा अप्सरा या नावाच्या जलदेवतांचा एक प्रकार आहे. तरूण मुली अथवा एकदोन मुले झालेल्या स्त्रिया यांनी काही कारणाने जर पाण्यात आत्महत्या केली, तर त्यांचे आत्मे या स्वरूपात भूतलावर पुन्हा वावरतात असा समज आहे. तसेच, एखादी स्त्री बाळंतपणाच्या काळामध्ये मृत्यू पावली तर ती पुन्हा या पिशाच्च-योनीमध्ये वावरते. याचाच अर्थ असा की, ही योनी पिशाच्च स्वरूपाची आहे, असा समज प्रचलित आहे. यांचे वास्तव्य विहिरी, तळी जलाशये इ. ठिकाणी असल्याने त्यांना काही ठिकाणी जलदेवता मानलेले आहे.

स्वरूप

या अप्सरा नेहमी सातच्या संख्येने वावरतात म्हणून त्यांना सात आसरा म्हणतात. यांची वस्ती जलाशयाच्या ठिकाणी असते तशीच ती तीन रस्ते अथवा तीन पायवाटा जेथे एकत्र मिळतात तिथेही असते असे मानले जाते. लढाईतील वीराला जे मरण प्राप्त होते त्याप्रमाणे या आसरांचे स्वरूप आहे. ही पिशाच्चे परद्वेष्टी असून त्यांना चंद्र देवतेप्रमाणे वागावयाचे असते, त्यामुळे त्यांना देवतेच्या मैत्रिणी संबोधिले जाते, असा समज आहे. दक्षिण भारतात यांना काही ठिकाणी ग्रामदेवता मानतात. या कुमारिका असून तळ्याचे रक्षण करतात. तळी किंवा जलाशय यांना जेथे भेगा पडण्याचा संभव असतो तेथे त्यांच्या मूर्ती बसवितात. दुर्गा भागवत यांच्या मते (लौकिक दंतकथा, नवभारत, नोव्हेंबर १९५९) या देवतांचे प्रतीक म्हणून सात दगड शेंदूरचर्चित करून त्यांची पूजा केली जाते. दक्षिण भारतात सात आसराना एक भाऊही असतो.

इतिहास
स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या स्त्रिया या अप्सरा होत. अथर्ववेदामध्ये याविषयी अधिक माहिती आढळते. विश्वावसु गंधर्व याच्यासह उर्वशी या अप्सरेचा संबंध दाखविला आहे. ऋग्वेदाच्या उत्तर काळात भूलोक व विशेषत: त्यावरील वृक्ष हे देखील यांच्या संचारक्षेत्रामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. औदुंबर व पळस वृक्षावर यांचा निवास असतो, असे मानले जाते.

समाजात प्रचलित समज

या अप्सरा एकदम एखाद्या सावजावर झडप घालतात. यांचे सावज म्हणजे कमकुवत अथवा मृदू मनाची माणसे. त्या लहान मुलांनाही पछडतात. त्यामुळे अवसे-पौर्णिमेच्या त्यांच्या फिरण्याच्या दिवशी लहान मुलांना तिन्हीसांजेच्या वेळी अथवा रात्री बाहेर पाठवू नये. यांचे स्वरूप विचित्र असते. त्या कधी कुत्री, मांजर यांच्या स्वरूपातही असतात. काही ठिकाणी गाय अथवा म्हैस व्याली म्हणजे पहिल्या तीन दिवसांचे दूध या देवतांना अर्पण करण्यात येते नाहीतर दुभते जनावर आटून जाईल असा समज आहे. या आसरानी कोणाला त्रास देऊ नये म्हणून त्यांचे वार्षिक देणे ठरावीक दिवशी त्या जागी ठेवले जाते. ग्रामीण भागात भरघोस पीक यावे, विहिरीचे पाणी आटू नये, पिकावर रोग पडू नये म्हणून आसरांची पूजा करतात. अमावास्येला नारळ फोडतात.

प्रांतानुसार नावे

भारताच्या विविध भागात प्रचलित नावे अशी-
गुजराथ- शंखिणी
म्हैसूर- अक्कागारू
मद्रास-आसकनिकल
पंजाब-जलपरी /जोगिनी

विहिरी, तळी, पाणवठे या ठिकाणी त्यांची वस्ती असल्याने त्यांना जलयोगिनी असेही म्हणतात असे जेम्स धर्मकोशात पृष्ठ ७१८ वर नोंदविले आहे.
महाराष्ट्र ज्ञानकोशकरांच्या मते आसरा हा शब्द अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. या देवता जलामध्ये राहतात ,म्हणून त्यांना जलदेवता असेही म्हटले जाते.
सात आसरांची जी नावे प्रचलित आहेत, ती जलचराच्या नावावरूनच आलेली दिसतात. नावे

मत्स्यी - माश्याचे रूप असलेली
कूर्मी -कासवाचे रूप असलेली
कर्कटी -खेकड्याचे रूप असलेली
दर्दुरी -बेडकाचे रूप असलेली
जतुपी?
सोमपा?
मकरी - मगरीचे रूप असलेली
महाराष्ट्रात काही भागात त्यांना "माऊल्या" असेही म्हणतात.

यात्रा
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील नेरखेड जवळच्या जीवरेखा नदीत तसेच औरंगाबाद जवळील कचनेर विहिरीत आसरांची यात्रा भरते.
आदिवासी संस्कृतीत गोंड साहित्यात याच्या उत्पत्तीविषयी एक रम्य कथा आहे.गोंड त्यांना दौगन गुरुच्या कन्या मानतात.
संदर्भ

^ प्रभुदेसाईप्र.कृ. देवीकोश खंड ३, १९६८

^ प्रभुदेसाईप्र.कृ. देवीकोश खंड ३, १९६८

^ प्रभुदेसाई, देवीकोश खंड ३, पृष्ठ २१०

^ डॉ. लोहिया शैला, भूमी आणि स्त्री ,२००२

^ प्रभुदेसाई प्र.कृ. देवीकोश खंड ३, १९६८

^ डॉ. लोहिया शैला, भूमी आणि स्त्री ,२००२

माहिती संकलनःश्री दीपक कुळकर्णी.