दिनांक _२३ मार्च २०१९ फाल्गुन कृ.३ शनिवार

विशेष सुचना - हा लेख सश्रध्द आस्तिकांकरता व परशुराम भक्तांकरता आहे नास्तिकांनी याकडे दुर्लक्ष करावे.

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आजपासुन भगवान परशुरामांचे चरीत्र माझ्या अल्पज्ञानाने आपल्या समोर मांडण्याच्या प्रयत्न करणार आहे. प्रसिध्द हिंदुत्वनिष्ठ इतिहास तज्ज्ञ, लेखक डॉ.सच्चिदानंद शेवडे गुरुजींनी केलेल्या आज्ञेस अनुसरुन हे चरीत्र मांडणार आहे.आमचे मार्गदर्शक संतसाहित्याचे व दत्तसंप्रदायाचे अभ्यासक श्री.रोहनदादा उपऴेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिऴाल्यामुऴे व त्यांनीच धीर दिल्यामुऴे हा गाढवपणा करण्याचा प्रयत्न करतोय परशुरामांचे चरीत्र वाचण्यापूर्वी ललीत लेखकांनी, पुरोगाम्यांनी मांडलेले परशुरामांबद्दलचे पूर्वग्रह बाजुला ठेवावेत . "तस्मात शास्त्रं प्रमाणं ते "असे ठामपणे सांगणारे भगवंत कधीच शास्त्रबाह्य वागणार नाहित हे लक्षात ठेवावे. परशुराम हे महाविष्णुंचे सहावे अवतार आहेत.यदा यदा हि धर्मस्य。जेव्हा जेव्हा धर्मास ग्लानी येते तेव्हा तेव्हा साधु सज्जनांच्या रक्षणाकरता व दुष्ट निर्दालनाकरता भगवंत अवतार घेतात हे आपण जाणताच. अंशावतार, अंशअंशावतार, कलावतार, आवेशअवतार व पूर्णावतार असे अवतारांचे प्रकार आहेत.
परशुराम हा महाविष्णुंचा "आवेश "अवतार आहे.मत्स्य कुर्म , वराह वामन हे अंशावतार होते परशुराम हे आवेश अवतार आहेत नारसिंह, राम व कृष्ण हे पूर्णावतार आहेत.
अंशावतारात कार्य घडले दुष्ट निर्दालन झाले कि अवतार समाप्ती होते, पूर्ण अवतार हा दुष्टांचे निर्दालन तर करतोच पण त्याच सोबत आपली उपासना परंपरा निर्माण करतो पूर्णावतार हा भक्तांना अनुग्रह देतो व त्यांचा उध्दार करतो नृसिंह अवतारात प्रल्हादाला अनुग्रह भगवंतानी दिला व त्याच्या घराण्यात उत्तरोत्तर श्रेष्ठ भक्तपरंपरा स्थापन केली व त्या सर्व घराण्याचा उध्दार केला (प्रल्हाद विरोचन व बऴी) आज देखील नृसिंह कुलदैवत असलेली मंडऴी आहेत त्यांच्या घराण्यात नृसिंह उपासना सुरु आहे .
कृष्णाने अर्जुन व उध्दवास प्रत्यक्ष अनुग्रह दिला त्यांचा व घराण्याचा उध्दार केला (अर्जुन, अभिमन्यु, परिक्षीत व जनमेजय या सर्वांवर भगवंतांची परमकृपा झाली) व कृष्णभक्ती परंपरा सुरु झाली .रामांचे चरीत्र तर दिव्य अलौकीक आहे वाल्मिकी, अहिल्या या सारख्या अनेकांचा उध्दार रामानी केला आहे रामनाम परंपरा रामांचे नवरात्र किंवा रामांची उपासना आज देखील सुरुच आहे हे सर्व पूर्णावतार होते.
परशुराम हा भगवंतांचा आवेश आहेत त्यामुऴे परशुरामांची उपासना करणे हे थोडे कठिण काम त्यामुऴे परशुरामांचे उपासक तुलनेने कमी आहेत उत्तरभारत व राजस्थानात अनेक परशुराम उपासक आहेत.
परशुरामांचे चरीत्र अभ्यास करताना काहि गोष्टि विचारात घेणे आवश्यक आहेत असे मला वाटते
१- परशुराम हे परम दत्तभक्त व दत्तमहाराजांचे अनुग्रहित शिष्य होते.
2 कार्तवीर्य सहस्त्रार्जुन देखील परमदत्तभक्त व दत्तानुग्रहितच होते. कार्तवीर्य सहस्त्रार्जुन यांच्या काहि मंत्रोपासना आज देखील उपलब्ध आहेत व त्या अत्यंत प्रभावी आहेत.
अेखादि वस्तु हरवल्यास
कार्तवीर्य सहस्त्रार्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् ।
तस्य स्मरण मात्रेण गतं नष्टं च लभ्यते ।।
हा मंत्र जप केला असता वस्तु तात्काऴ परत मिऴते हा अनेकांचा अनुभव आहे तेव्हा परशुराम चरीत्र वाचताना ते कादंबरी होणार नाहि याची दक्षता घेवुनच ते अभ्यासले पाहिजे .कार्तवीर्य सहस्त्रार्जुन हे जवऴपास ८५००० वर्षे आयुष्य योगसामार्थ्याने जगले होते.
परशुराम व सहस्त्रार्जुन हे दोन्हि परमपदास पोहचलेले दत्तभक्त च आहेत तेव्हा त्यांचे चरीत्र तेवढ्याच सामर्थ्यवान व्यक्तींनी लिहिलेले असणे आवश्यक आहे म्हणुनच प्रत्यक्ष दत्तावतार असलेले प.प.वासुदेवानंद सरस्वति (टेंब्ये स्वामीं) यांनी दत्तपुराण, दत्तमाहात्म्यात मांडणी केल्याप्रमाणे व त्याच सोबत भागवत महापुराण, विष्णुपुराण, रामायण महाभारत या सर्व ग्रंथांचा सप्रमाण ससंदर्भ लिहिण्याचा हा प्रयत्न आहे यात काल्पनिक काहि घुसडले जाणार नाहि हि दक्षता घेवुन हा प्रयत्न करणार आहे.
परशुराम हे ब्राह्म व क्षात्र तेजाचा दिव्य अलौकिक संगम आहेत.शाप देणे व बाण चालवणे या दोन्हि गोष्टि ते सहजसाध्य करणारे आहेत.
भगवंत कधीच शास्त्रबाह्य वर्तन करत नाहित त्यामुऴे शास्त्रदृष्ट्या परशुरामांचे चरीत्र अभ्यासणे हे उत्तम ठरेल. आपण शाऴेत कार्यालयात , रुग्णालयात जाताना त्या त्या संस्थांचे नियम पाऴतो तिथे मला काय वाटतेय? याला महत्व नसते तर संस्थेला किंवा त्यांच्या घटनेत काय नियमावली आहे याला महत्व असते तद्वत भगवंत हे मला काय वाटते किंवा तुम्हाला काय वाटते यांचा विचार करत नाहित तर ते शास्त्रमर्यादांचे नियम पाऴुन वर्तन करतात व शास्त्र हे वरकरणी कठोर भासते परंतु ते मातृवात्सल्यवत मृदु असते.
नारळ अथवा फणस हा बाहेरुन कठोर भासले तरी अंतर्यामी ते मधुरच असतात शास्त्राचे देखील तसेच अाहे. तेव्हा प्रस्तावना पूर्ण करुन उद्यापासुन परशुराम चरीत्र पाहु.
तुर्त लेखन मर्यादा

वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com