लेखनमाला क्र.6
दि. २४ एप्रिल २०२०
नमस्कार.
सर्व विद्वत् जनांना नमस्कार करून आणि ज्यांच्या सद्वर्तना ने धर्म जगतो, टिकतो अशा धार्मिक सज्जनांना आणि वैदिक मंडळींना अभिवादन करून माझा अल्पशा मतीने भगवान विष्णुच्या अवतारातील भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध यांच्यातील फरकाबद्दल काही लिहिण्याचा प्रयत्न करतो.
सद्य परिस्थितीत भगवान बुद्ध आणि गौतम बुद्ध दोन्हीही एकच आहेत अस आत्ताच्या काळात बहुतांश सामान्य जनतेला वाटते आहे किंबहुना तसे मुद्दाम बिंबवले गेले.... पण हे गौतम बुद्ध संस्थापित बौद्ध धर्म अनुयायी देव मनातच नाहीत त्यामुळे भगवान बुद्ध आणि गौतम बुद्ध एकच आहेत असं भासवून देवानेच बुद्ध अवतार घेऊन बौद्ध धर्म स्थापन केला अस पसरवून त्यातून मुद्दाम जातीय तेढ निर्माण व्हावी या करिता तसे गेले असावे असे वाटते. असो... तर सर्व सामन्यांच्या मनातील या भगवान बुद्ध आणि गौतम बुद्ध हे एकच की वेगवेगळे ही शंका दूर करण्यासाठीच हा लेखन प्रपंच.
भगवान बुद्ध आणि गौतम बुद्ध हे दोन्ही वेगळे आहेत आता ते कसे ते आपण बघूच पण त्याआधी भगवान विष्णुंच्या एकूण अवतार कोणते ते पाहू.
अवतार म्हणजे काय ? त्या परमेश्वराला अवतार घेण्याचे प्रयोजनच काय? तर अवतृ या धातू पासून अवतार हा शब्द आला. आहे त्या पासून वेगळे होणे किंवा शब्दशः अर्थ खाली येणे... जसे रुपयाचे अवमूल्यन होणे म्हणजे किंमत कमी येणे किंवा खाली येणे. अव म्हणजे खाली तृ म्हणजे विग्रह धारण करणे म्हणजेच आपल्या सर्व सामन्यांना दृगोचार होणे आणि त्यासाठी पाहाता येईल, स्पर्श करता येईल असे होणे. आता अस करण्याची गरजच काय... त्याला जर दुष्ट लोकांचा संहारच करायचा असेल तर तो आहे तिथूनच करू शकतोच की? त्याने आहे तिथूनच एखादा अवयव निकामी केला तरी सुद्धा त्याचा संहार होईलच की बरोबर ना? उदा. हृदय बंद पडणे, हृदय विकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे, रक्तदाब कमी जास्त ई.. तो काहीही करू शकतो . मग तरी पण का अवतार घ्यायची गरज? त्याच्याच शक्ती ने सर्व अवयव काम करतात ना. पण त्याच भगवंताने श्रीकृष्ण अवतारा मध्ये ज्या गीतेचा उपदेश केला त्यात त्यांनी सांगितले की
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम्।
धर्म संस्थपनार्थाय संभवामि युगे युगे।।
म्हणजेच पहिलं कारण त्याच्या येण्याचं साधुंना, संत-सज्जनांना, भक्तांना भेटणे, त्यांच्या सामान्य दृष्टीला दिसणे, दर्शन देणे, भक्तांना स्पर्श करता येणे, भक्तांचे संरक्षण करणे आणि दुसरे कारण म्हणजे नाईलाजाने दुष्टांचा संहार करणे आणि त्यायोगे धर्म स्थापना करणे पर्यायाने सृष्टीची बिघडलेली घडी व्यवस्थित बसवणे. नाईलाजाने यासाठी म्हणालो की त्यांना मारण्याची इच्छा भगवंतालाही नसते परंतु समजावूनही दैत्य, दानव, दुष्ट ऐकत नाहीत तेव्हा त्यांचा संहार करावा लागतो. असो.
आता अवतार नक्की किती झाले? कोण म्हणतात10, कोणी 12, कोणी 20.. तर नक्की किती अवतार झाले?
त्याचे उत्तर आहे एकूण अवतार 22 आहेत. त्यातील21 अवतार होऊन त्या वेळेचे ते ते कार्य पूर्ण करून भगवंताने अवतार कार्य संपवले. बाविसावा अवतार होणे बाकी आहे. तो कलियुगाच्या समाप्तीच्या वेळी विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्कि रूपाने अवतार होईल. त्याआधी चे 21 अवतार कोणते आणि त्यांचे कार्य थोडक्यात पाहू.
१) सनक, सनंदन, सनातन, सनत्कुमार या चौघांच्या रूपात पहिला अवतार घेऊन अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्य आश्रमाचे कसे पालन करावे याचा आदर्श घालून दिला.
२) वराह रूपाने पृथ्वीचे संरक्षण केले.
३) देवर्षी नारद मुनी रूपाने अवतार घेऊन उत्तम कर्म करूनच कर्म बंधातून मुक्ती कशी मिळते याचे वर्णन केले.
४) नर- नारायण रूपाने अवतार धारण करून ऋषि होऊन इंद्रियांचा संयम राखून तपश्चर्या कशी करावी याचा आदर्श घालून दिला.
५) कपिल मुनी रूपात येऊन लुप्त झालेले तत्वनिर्णय आणि सांख्यशास्त्र सांगितले.
६) पतिव्रता अनसूयेे ला दिलेल्या वरानुसार आत्रिपुत्र दत्तात्रेय होऊन अलर्क, प्रल्हाद आदींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला.
७) रुची प्रजापती च्या आकुति नामक पत्नीपासून यज्ञरुपाने अवतार घेऊन देव आणि स्वायंभुव मन्वंतराचे संरक्षण केले.
८) ऋषभ देवांच्या रूपाने अवतार घेऊन सर्व लोकांना, आश्रमांना वंदनीय असा परमहंस मार्ग दाखविला. हेच जैन धर्माचे पहिले तीर्थंकर झाले.
९) ऋषींच्या प्रार्थनेवरून पृथू राजाच्या रूपात येऊन पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या.
१०) मत्स्य रूपाने प्रगट होऊन नैमित्तिक प्रलायातून वेद, औषधी, ऋषि, सत्यव्रत राजा , उत्तम प्रजा अर्थात सृष्टीवर जे काही चांगले आहे त्याचे संरक्षण.
११) कूर्मरुपाने समुद्र मंथनात मंदराचल पर्वताला पाठीवर आधार देऊन देवांना मदत केली.
१२) धन्वंतरी च्या रूपात समुद्र मंथनातून अमृत आणि आयुर्वेद घेऊन प्रगट झाले.
१३) मोहिनी रूपाने दैत्यांना मोहित करून देवांना अमृत पाजले.
१४) नृसिंह रूप घेऊन हिरण्यकष्यपुचा वध करून भक्त प्रल्हादाला दर्शन, वर दिले.
१५) वामन रूपात येऊन बळीराजाला बंधनात टाकले.
१६) परशुराम अवतार घेऊन ब्राह्मणांचा द्वेष करून अराजक झालेल्या क्षत्रियांचा वध करून 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली.
१७) व्यास रूपाने अवतार घेऊन लोकांची जाण आणि ग्रहणशक्ती कमी झाल्याचे पाहून वेद, पुराणे यांचे वर्गीकरण केले.
१८) श्रीराम होऊन रावणाचा वध करून सामान्य मनुष्याने कसे राहावे, वागावे याचा आदर्श घालून दिला.
१९) आणि २०) बलराम आणि पूर्णावतार श्रीकृष्ण रूपात येऊन पृथ्वीवरील दुष्टांचा भार कमी केला.
२१) देवतांचा, वेदांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करून त्यांचा वध करून वेदांचे, पुराणांचे संरक्षण बौद्ध रूपात प्रगट झाले.
आणि 22 वा अवतार कल्कि.
वरील सर्व अवतार हे भगवंताचे अंश अवतार, आवेश अवतार आणि फक्त प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण हे पूर्णावतार आहेत. वरील अवतार क्रम हा भागवतात दिलेल्या कथा क्रमा प्रमाणे दिलेले आहेत.
........ प्रत्यक्षात त्यांचा क्रम वेगळा आहे. याशिवाय अजूनही अंशांशावतार भगवंताचे आहेत. उदा. ऋषी, मनू, मनू पुत्र ई. तर आता आपण पाहू भगवान बौद्ध आणि गौतम बुध्द हे वेगळे आहेत याबद्दल माहिती. बुद्ध अवताराचे प्रयोजन असलेले मूळ श्लोक पाहू.
१) एवं बुध्यत बुध्यध्वं बुध्यतैवमितीरयन् ।
मायामोहः स दैत्येयान् धर्ममत्याजयन्निजम् ।।
-विष्णु पुराण.
आता याचा अर्थ पाहू.
बुध्यत- जाणा, बुध्यध्वं- समजून घ्या, बुध्यत- लक्ष द्या, अशा शब्दांनी माया मोहाने दैत्यांना, यज्ञाच्या अनधिकाऱ्यांना उपदेश करून त्यांच्या तावडीतून धर्माची, वेदांची सुटका केली.
२) ततः कलौ संप्रवृत्ते सम्मोहाय सुरद्विषाम् ।
बुद्धो नाम्ना जनसुतः कीकटेषु भविष्यति ।।
-श्रीमत् भागवत.
आता याचा अर्थ पाहू.
कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशात (बिहार) अजनाच्या पुत्राच्या रूपाने बुद्धावतार होईल.
वरील दोन वेगवेगळ्या पुराणातील श्लोकावरून बुद्धवाताराचे भगवंताचे प्रयोजन दिसून येते. जे गौतम बुद्धांनी कार्य केलेच नाहीये.
आता भगवान बुद्ध आणि गौतम बुद्ध यांचा जन्म स्थान, काल यातील भेद पाहू.
भगवान बुद्ध- १) वर्ण - ब्राह्मण ,२) जन्मस्थान- कीकट देश (गया), बिहार,३) जन्म तिथी- पौष शुक्ल सप्तमी, ४)काळ- कलियुगाच्या आरंभापासून १००० वर्षानंतर
गौतम बुद्ध- १) वर्ण- इक्ष्वाकु वंशीय क्षत्रिय, २) जन्मस्थान- लुंबिनी, नेपाळ,३) जन्मतिथी- वैशाख पौर्णिमा,४) काळ- कलियुगाच्या आरंभापासून २७०० वर्षानंतर.
वरील चारही भेदावरून दोन्ही भिन्न आहेत हे दिसून येते.
आता हे दोनही एकच आहे असे वाटण्याची कारणे काय आहेत हे पाहू.
१) अमरकोष या संस्कृत समानार्थी शब्दांच्या कोशात भगवान बुद्ध आणि गौतम बुद्ध यांची नावे समानार्थी शब्द म्हणून दिले आणि अमरकोष सर्वत्र प्रसार झाल्याने दोन्ही व्यक्ती समान वाटू लागल्या.
२) भगवान बुद्ध आणि गौतम बुद्ध यांचे गोत्र "गौतम" समान होते.
३) अग्नि पुराणामध्ये भगवान बुद्धांचे ध्यान दिलेले आहे. यात भगवान बुद्धांच्या मूर्तीचे वर्णन आहे. पुढे बौद्धांनी गौतम बुद्धांच्या मूर्ती याच वर्णनावरून बनल्याने दोन्ही बुद्धांच्या मूर्ती समान झाल्या.
या सर्वावरूनच हे लक्षात घ्या की भगवान बुद्ध आणि गौतम बुद्ध हे भिन्न आहेत, तसेच भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली नाही.
काही तज्ज्ञांच्या मते विठ्ठल ही देवता सुद्धा बुद्धावतार आहे. असेही असू शकते कारण भगवंत हा अंश रूपाने खूप ठिकाणी एकच वेळी अवतार धारण करतो. उदा. बलराम- श्रीकृष्ण, सनक- सनंदन ... असो.
लेख मोठा आहे परंतु सर्व सविस्तर विचार केल्याशिवाय या बुद्धातील भेदाच्या निकषावर येणे शक्य नव्हते. म्हणून एवढे सर्व लिहिण्याचा प्रपंच केला.अस्तु.
संदर्भ- १)समान वाटण्याची कारणे- श्री शिवावतार भगवत्पाद शंकराचार्य. रचयिता: श्री गोवर्धनमठ पुरीपीठाधीश्वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चालानंदसरस्वती.
२) अवतार -श्रीमद् भागवत, विष्णु पुराण.
©️वे. विष्णु रामचंद्र कुडके गुरुजी.
9892308383