गागाभट्ट यांची माहिती .

वेदविद्याविभूषित आणि निस्पृह गागाभट्ट!!

आम्हाला गागाभट्टांबद्दल बहुतेक वेळेस माहिती नसते. असली तर ती इतकीच की गागाभट्ट नामक आणि कोणीएक उत्तर हिंदुस्थानातील ब्राह्मण होता. ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला आणि त्याच्या मोबदल्यात महाराजांकडून दक्षिणा घेतली!!

वेदोनारायण, वेदान्तसूर्य, महामीमांसक, विद्वतचूडामणी, वेद्विध्याकान्ठभार्ण, ह्या त्यांच्या आणखी पदव्या होत्या. दिनकरध्योत, पिंडीपितुय्ज्ञाप्रयोग, समय्नय हे देखील त्यांचेच ग्रंथ. त्यांचे खरे नाव विश्वेश्वर. परंतु त्यांचे वडील दिवाकरभट्ट त्यांना लाडाने गागा म्हणत.

गागाभट्टांचे मूळ हे आपल्याच मातीतले; महाराष्ट्रातील पैठण इथले!! रामेश्वरशास्त्री भट्ट हे गागाभट्टांचे पणजोबा. ते द्वारकेच्या यात्रेला गेले आणि त्यानंतर पुढे काशी येथे स्थायिक झाले. अतिशय विद्वान असे हे घराणे. रामेश्वरशास्त्रीचे ज्येष्ठ पुत्र नारायणभट्ट यांनी काशीतील मुघल आक्रमकांकडून उद्ध्वस्त केले गेलेले विश्वनाथाचे मंदिर स्वखर्चाने पुनर्स्थापित केले!! या नारायणभट्टांचे ज्येष्ठ पुत्र रामकृष्णभट्ट आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे गागाभट्ट अशी ही विद्वानांची वंशावळ.

मीमांसाकुसुमांजली, भट्टचिंतामणी, राकागम, निरूढ पशुबंधप्रयोग, सुज्ञानदुर्गोदय इ. अनेक ग्रंथांची निर्मिती गागाभट्टांनी केली. याच गागाभट्टांनी काशी येथील विद्वानांचा रोष पत्करून ब्राह्मणेतर हिंदूंसाठी वेद्पाठशाळा सुरु करण्याचे क्रांतिकारी पाउल उचलले. इतकेच नव्हे तर तसे करणे हे शास्त्रसंमत असल्याचे पुरावे देण्यासाठी 'समयनय' नामक ग्रंथदेखील रचला!

महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला अशी आवई नेहमीच उठवली जाते. परंतु महाराष्ट्रप्रांतात त्याकाळी कोणीही राजा नसल्याने (किंबाहुना प्रदीर्घ काळापासून कोणीही राजा न झाल्यामुळे ) येथील पुरोहितांना 'राज्याभिषेकविधी' अवगत नव्हता; त्यामुळेच त्याकाळी महाराष्ट्रात आलेल्या गागाभट्टांना याविषयी विचारणा होणे स्वाभाविक होते!! गागाभट्टांनी 'राज्याभिषेकप्रयोग' नामक विशेष ग्रंथाची रचना रायगडावरच करून त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने महाराजांवर उपनयनसंस्कार करून व त्यांचे सर्व पूर्वविवाह पुन्हा एकवार करवून मग समंत्रक राज्याभिषेक केला आणि शिवराय 'सिंहासनाधीश्वर' झाले!!

गागाभट्टांनी दक्षिणा घेतली जरूर; मात्र पुढील काही महिन्यातच त्यांनी संन्यासश्रम स्वीकारला आणि मिळालेल्या दक्षिणेचा विनियोग आपल्या वेदपाठशाळेसाठी केला!! 'कायास्थाचार दीपिका' नामक ग्रंथ रचणाऱ्या गागाभट्टांनी बाळाजी आवजी चिटणीसांच्या बंधूंच्या नातवाच्या उपनयनसंस्काराबाबत पुढाकार घेऊन कायास्थांनादेखील उपनयनाचा अधिकार असल्याचे छत्रपती शंभूराजे यांच्या लक्षात आणून दिले.

केवळ 'ब्राह्मण' असल्यामुळे इतिहासातील व्यक्तीमत्वांवर चिखलफेकीचे काम करत राहायचे असल्यास खुशाल करावे; मात्र तसे करण्यात आपलेच हात चिखलाने बरबटत आहेत इतकेच लक्षात असू द्यावे!!

आभार...
परीक्षित शेवडे